रविवार, २ जून, २०१३

विद्यापीठ नामांतर हि सोलापूरची गरज?

२००४ साली पुरोगामी महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यासाठी असे स्वतंत्र सोलापूर विद्यापीठ स्थापन झाले. भारतामधील हे एकमेव विद्यापीठ अनेक राज्यांपुढे पथदर्शी ठरले. देशातील अनेक शिक्षणतज्ञ सोलापूर विद्यापीठाकडे एक शैक्षणिक प्रयोग म्हणून पाहत आहेत. असे हे प्रगत विद्यापीठ योग्य उंचीवर घेऊन जाण्यासाठी जिल्यातील सर्व क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिंचेसहकार्य लाभले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे. सोलापूर विद्यापीठामधील अनेक यशस्वी प्रकल्पाचे अनुकरण बाकी विद्यापीठामध्ये होताना दिसत आहे. याचे श्रेय अनेक विद्यार्थी, प्राध्यापक, राजकीय व्यक्ती सामाजिक संघटनांना जाते.

नुकतेच हे विद्यापीठ नामांतराच्या मुद्याहून चर्चेला आले आणि सर्वांना मराठवाडा विद्यापीठ नामांतराची आठवण झाली असेल. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सर्वात जास्त काळ सुरु असलेले असे हे आंदोलन होते. या आंदोलनामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता तर समाजामधील विविध जातीमध्ये तेढ निर्माण झाली. परिणामी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे विशिष्ट जातीचे विद्यापीठ म्हणून काही काळ लोक पाहत होते. त्यातून सावरण्यासाठी मराठवाड्याला बराच काळ घालवायला लागला. तुलनेत सोलापूर विद्यापीठ हे सर्वसमावेशक म्हणून उदयाला आले आहे. मात्र आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा असा विचार करणाऱ्याच काही संघटनांनी विद्यापीठाचे नामांतर करण्याचा घाट घातला आहे. आम्हा विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे नाव बदलून काही फायदा होणार नाही याचा संघटनांनी विचार करण्याची गरज आहे.

 तसे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नामांतर हे काही नवे नाही. छत्रपती शिवरायांचे नाव ज्या विद्यापीठाला मिळाले ते "शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ",  "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद" ज्याला शहराचे नाव शाबूत राखण्यात यश आले ते  "पुणे विद्यापीठ पुणे"  या आपल्या सभोवतालच्या सर्व विद्यापीठांमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे नाव बदलण्याने सर्वसामान्य नागरिक विद्यार्थ्यांना काहीही फायदा नाही हे उघड सत्य आहे. फक्त राजकीय पोळी भाजून निघणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

एक सोलापूरचा विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी नुकतीच आपल्या विद्यापीठामध्ये चक्कर टाकली आणि लक्षात आले कि सर्व रस्त्यांवर सौर दिवे आहेत. तसेच छोट्या छोट्या खेड्यामध्ये, वस्तींवर  जिल्हा परिषदेने दिलेले सौर दिवे चमकताना दिसले. हे सर्व विद्यापीठ जिल्हा प्रशासनाने शक्य केले आहे. अहो थोडक्यात काय तर सोलापूरचे 'सोलार'पूर होणार आहे. काय माहित भविष्यात आपल्या विद्यापीठामध्ये या संशोधनाला गती मिळून जगामध्ये हे ‘सोलार विद्यापीठ’ म्हणून प्रसिद्ध होईल. अशाच प्रगतीची अपेक्षा आपल्याला विद्यापीठाकडून आहे. आपण सोलापूरकर  या स्पर्धेच्या युगामध्ये कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर पुण्याला जाण्याचा विचार करतो. सोलापूरला अभ्यासाचे वातावरण नाही असे सांगतो. हि वस्तुस्थिती जरी असली तरी ती बदलण्याची संधी आहे. नामांतर करण्यासाठी ज्या संघटना प्रसार माध्यमे समोर आली आहेत  त्यांनी योग्य गोष्टीची मागणी करून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभारले पाहिजे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय विद्यापीठ याचे संगनमत करून अनेक ठिकाणी होस्टेल्स लायब्ररी नव्याने उघडल्या पाहिजेत. यामुळे शैक्षणिक वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होईल याची खात्री वाटते. खर म्हणजे आपल्या नशिबाने जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय विद्यापीठ या सर्व ठिकाणी भविष्याचा योग्य वेध घेणारे नेतृत्व आज राज्य करीत आहे.

हे विद्यार्थी हिताचे निर्णय जर आपल्या जिल्ह्यातील व्यक्तींना मान्य नसेल नामांतर करायचेच असा निर्णय झाला तर, विद्यापीठाने इतिहासामधील एखाद्या व्यक्तींचे नाव देण्याऐवजी भूगोल बदलणाऱ्या व्यक्तीचे नाव द्यावे. म्हणजेदेशातील जो स्त्री-पुरुष सर्वप्रथम नोबेल पारितोषिक मिळवेल” त्याचे नाव सोलापूर विद्यापीठाला दिले जाईल असे जाहीर करावे. तरच हि स्पर्धेच्या युगातील खरी नांदी ठरेल.

1 टिप्पणी: